तामिळनाडू/विश्वमंथन वृत्त

लोकशाहीत सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजकारणात अनेकदा पैसा, बाहुबल आणि प्रदीर्घ अनुभवाचा असा काही ‘अहंकार’ निर्माण होतो की, नेत्यांना जनतेच्या एका मताची किंमत वाटेनाशी होते. पण तामिळनाडूच्या तिरुपत्तर मतदारसंघातील निकालाने या अहंकाराला जबरदस्त तडा दिला आहे. पाच वेळा आमदार राहिलेल्या आणि सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या एका दिग्गज मंत्र्याचा पराभव केवळ ‘एका मताने’ झाला आहे. हा निकाल म्हणजे लोकशाहीतील त्या प्रत्येक सामान्य माणसाचा विजय आहे, ज्याला प्रस्थापित राजकारणी अनेकदा गृहीत धरतात
तामिळनाडूच्या राजकारणात के. के. पिया करूण हे एक मोठे नाव. सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम आणि मंत्री म्हणून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी होता. सत्ता आणि अनुभवाच्या जोरावर हा विजय सोपा आहे, असा समज असणाऱ्या या दिग्गज नेत्याला एका नवख्या उमेदवाराने धूळ चारली. ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाचे उमेदवार श्रीनिवास सेतुपती यांनी या निवडणुकीत इतिहास घडवला. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत श्रीनिवास सेतुपती यांना ८३,३७५ मते मिळाली, तर मंत्री महोदयांना ८३,३७४ मते मिळाली. केवळ एका मताचा हा फरक म्हणजे केवळ आकडा नाही, तर तो प्रस्थापितांच्या सत्तेला बसलेला सुरुंग आहे.
जेव्हा एखादा नेता सलग अनेक वर्षे सत्तेत असतो, तेव्हा अनेकदा त्याला वाटते की जनता माझ्या खिशात आहे. हाच तो ‘अहंकार’ जो मतदारांना विसरायला लावतो. तामिळनाडूतील या मंत्र्यांच्या बाबतीतही तेच घडले. प्रस्थापित राजकारण, मोठी पक्ष संघटना आणि सत्तेचा वरदहस्त यांपुढे एक सामान्य कार्यकर्ता काय करणार, हा प्रश्न विचारला जात होता. पण मतदारांनी दाखवून दिले की, लोकशाहीत कुणीही ‘अजिंक्य’ नसते. एका मतात इतकी ताकद असते की, ती मंत्र्यांचे पद आणि प्रतिष्ठा एका क्षणात हिरावून घेऊ शकते.
हा निकाल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा सर्वात मोठा विजय आहे. साऊथ बुरो कमिशनसमोर साक्ष देताना बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी लढा दिला होता. आज तोच हक्क सत्तेचे संतुलन राखण्याचे काम करत आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असो किंवा हातावर पोट भरणारा मजूर, दोघांच्याही मताची किंमत ‘एक’ ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे. जर आज एका मताने एखाद्या मंत्र्याचा पराभव झाला असेल, तर त्याचे संपूर्ण श्रेय बाबासाहेबांनी दिलेल्या त्या एका मताच्या अधिकाराला जाते.
एका मताचा हा ‘अहंकार’ तोडण्याचा सिलसिला नवा नाही. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने पडले होते. सत्तेच्या शिखरावर असताना एक मत कमी पडणे किती महागात पडू शकते, याचे ते सर्वात मोठे उदाहरण. तसेच २००८ मध्ये राजस्थानमध्ये सी.पी. जोशी यांचा केवळ एका मताने पराभव झाला होता. विशेष म्हणजे, त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य त्या दिवशी मतदानाला गेले नव्हते. जर एका घरातील माणसाने आळस सोडून मतदान केले असते, तर आज सी.पी. जोशी राजस्थानचे मुख्यमंत्री राहिले असते. या सर्व घटना हेच सांगतात की, तुमचा एक मताचा अधिकार हे सर्वात मोठे शस्त्र आहे.
तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय थालापती यांनी ‘टीव्हीके’ पक्षाच्या माध्यमातून एक नवा प्रयोग केला. त्यांनी सामान्य घरातील तरुणांना तिकीट देऊन प्रस्थापितांना आव्हान दिले. ज्या विजय थालापतींना कधीकाळी सत्तेकडून अपमानास्पद वागणूक मिळाली होती, त्यांनीच आज आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांचे तख्त हलवून सोडले आहे. हा बदल सांगतो की, काळ कोणासाठीच थांबत नाही. जो आज राजा आहे, त्याने जनतेला विसरण्याचा अहंकार केला, तर उद्या त्याला रंक बनायला वेळ लागणार नाही.
आपण अनेकदा म्हणतो की, “राजकारणी सर्व सारखेच असतात, मतदान करून काय होणार?” पण तिरुपत्तरचा निकाल डोळे उघडणारा आहे. जर तुम्ही मतदान केले नाही, तर तुम्ही अशा नेत्यांना सत्तेवर बसवता ज्यांना तुमच्या प्रश्नांशी काहीच देणंघेणं नसतं. तुमचे एक मत हे केवळ बटन दाबणे नाही, तर ते एका अहंकारी नेत्याला घरी बसवण्याचे सामर्थ्य आहे. लोकशाहीत जनता ही ‘मालक’ आहे आणि निवडणुकीचा दिवस हा त्या मालकी हक्काची जाणीव करून देण्याचा दिवस असतो.
तामिळनाडूतील तो एक मताचा विजय ही केवळ एक बातमी नाही, तर तो एक इशारा आहे. हा इशारा त्या प्रत्येक नेत्यासाठी आहे जो सत्तेच्या धुंदीत जनतेला विसरतो. आणि हा इशारा त्या प्रत्येक मतदारासाठी आहे जो मतदानाच्या दिवशी घरी बसून राहतो. लोकशाही बळकट करायची असेल, तर घराबाहेर पडा. तुमच्या एका मताने इतिहास बदलू शकतो, हे आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. त्यामुळे तुमचा हा पवित्र अधिकार कधीच वाया घालवू नका, कारण हेच ते शस्त्र आहे जे अहंकाराचे किल्ले उद्ध्वस्त करू शकते.

Share