vishwamanthan

बुलढाणा:(विशेष प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा सामाजिक कार्यकर्ते  त्रिशूल पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “जशी साथ शिवरायांना दिली, तशी मोदींना द्या,” असे आवाहन करणाऱ्या भाजप महिला नेत्यांना उत्तर देताना पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी धोरणावर कडाडून टीका केली.
तुलना करणे हा महाराजांचा अपमान
त्रिशूल पाटील म्हणाले की, एका चहा विक्रेत्याची तुलना विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हा महाराष्ट्राचा आणि शिवरायांच्या उज्वल  इतिहासाचा अपमान आहे. “सक्षम नेतृत्वाला साथ दिली जाते, पण जे मूळ मुद्द्यांपासून पळ काढतात अशांना पाठबळ कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्वतःला ‘गोप्रतिपालक‘ म्हणवून घेणाऱ्यांच्या काळातच सत्तेतील नेते नितीन गडकरी यांची कंपनी गोमास विक्री करत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.
शेतकरी आणि जमिनींचे रक्षण की भक्षण?
“शेतकऱ्यांच्या पिकालाही हात न लावणारे आमचे छत्रपती कुठे आणि शेतकऱ्यांच्या जमिनींवर डोळा ठेवणारे आजचे मोगली वृत्तीचे राज्यकर्ते कुठे?” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. आज सत्तेत मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि सर्व मंत्री हिंदू असतानाही कोणत्या ‘हिंदुराष्ट्रा’ची मागणी केली जात आहे,  असा सवाल त्यांनी उपस्थित केला
नेत्यांची मुले परदेशात, मग सामान्य मराठा का भरडला जावा?
हिंदुराष्ट्राच्या नावाखाली भावनिक राजकारण करणाऱ्या नेत्यांचा समाचार घेताना पाटील यांनी थेट नावे घेत विचारणा केली की:
मेधा कुलकर्णी यांची मुले जर्मनीमध्ये का आहेत?
नितीश राणे, नवनीत राणा आणि गोपीचंद पडळकर यांनी आपली मुले देशात आणून सामान्य तरुणांप्रमाणे हिंदुराष्ट्राच्या लढ्यात का उतरवली नाहीत?
“तुमची मुले परदेशात शिकून तिथेच नोकऱ्या करणार आणि सामान्य मराठा तरुणाने मात्र शिवरायांच्या नावावर आपले कामधंदे सोडून तुमच्या राजकारणासाठी रस्त्यावर उतरायचे का? मराठा समाज इतका वेडा नाही,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.
महत्त्वाचे मुद्दे:
दामदुप्पट भूमिका: सत्तेत सर्व पदे हिंदूंकडे असताना पुन्हा हिंदुराष्ट्राचा जप कशासाठी?
दुटप्पीपणा: नेत्यांची मुले विदेशात आणि गरिबांची मुले रस्त्यावर.
इशारा: शिवरायांचे नाव घेऊन जनतेला भावनिक करणे थांबवा.
हिंदुराष्ट्र हवे असेल तर त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करा, जनतेला वेडे बनवू नका,” असे जाहीर आव्हान त्रिशूल पाटील यांनी दिले आहे. ही सडेतोड भूमिका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

 Disclaimer:

“वरील वृत्त हे सामाजिक कार्यकर्ते त्रिशूल पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशावर आधारित आहे. यामध्ये व्यक्त झालेली मते ही संबंधित व्यक्तीची वैयक्तिक मते असून, ‘विश्वमंथन’ न्यूज पोर्टल किंवा संपादक त्याच्याशी सहमत असतीलच असे नाही. आम्ही केवळ समाजमाध्यमांवरील घडामोडींची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहोत.”

Share